ताजी बातमी ऑनलाईन टीम
“विशाळगड हा शिवाजी महाराज यांना आश्रय देणारा किल्ला आहे. या विशाळगड किल्ल्यावर महाभयानक परिस्थिती निर्माण झाली असून जातीय तेढ किंवा हिंदू- मुस्लिम हा विषय नाही. विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणाला अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे विशाळगड मोकळा श्वास कधी घेणार हा खरा प्रश्न आहे. अशी भावना स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी राज्यसभा सदस्य संभाजीराजे म्हणाले, “आजच्या बैठकीला विशाळगडचे रहिवाशी उपस्थित होते. किल्ल्यावर अतिक्रमण तसेच अवैध गोष्टी होत आहेत हे सगळ्यांनी मान्य केलंय. तसेच महाशिवरात्रीच्या आधी हे अतिक्रमण काढलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याठिकाणी कुणाचाही दबाव खपवून न घेता जे मूळ लोकं आहेत त्यांनाच तिथे राहू द्या” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाशिवरात्रीच्या आधी हे काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं असून तेथील दर्ग्याबद्दल सवित्तर चर्चा झाली. हा दर्गा शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे. अलिकडच्या काळातील अतिक्रमणासाठी ज्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशाळगडाच्या संवर्धनासाठी 5 कोटी निधी दिला. पण त्याच काय केलं असा प्रश्न मी अधिकाऱ्यांना विचारला.” महाराष्ट्र- कर्नाटक सिमावाद यावर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “आम्ही आजही म्हणतो कर्नाटकची माणसं आपलीच आहेत. इथं येऊन बोम्माई काहीही वक्तव्य करत आहेत. वेळ पडली तर मला देखील कर्नाटकात जावं लागेल” अशा भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.