ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर फाईव्ह-जी (5G) सेवा सुरू करणार आहेत. भारतासाठी हा एक विशेष क्षण असेल आणि देश तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करेल. सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ही सेवा मिळणार आहे. या सेवेने देश आता सुपरफास्ट होणार आहे. भारतावर 5G चा एकूण आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 4G च्या तुलनेत, 5G नेटवर्क (5G Network) अनेक पटींनी जलद गती देते आणि बाधा-मुक्त कनेक्टिव्हिटी प्रदान करते.
सुरुवातीला या शहरांमध्ये होणार सुरु
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैश्वान यांनी आधीच सांगितलेय की, 5G हळूहळू देशात वेगवेगळ्या टप्प्यात सुरू केले जाईल. पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये पहिली 5G सेवा सुरू केली जाईल. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल.