मला विरोधी पक्षनेतेपदामध्ये कोणताही रस नाही. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, अशी मागणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा रोख प्रदेशाध्यक्षपदाकडे आहे का? अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात कोणती जबाबदारी कोणाला द्यावी याचा निर्णय मी एकटा घेत नाही, पक्षातील सर्व नेते मिळून अजित पवारांच्या मागणीवर निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
विरोधकांवर हल्लाबोल
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षातील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. यावरून बैठकीवर भाजपनं हल्लाबोल केला होता. या टीकेला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांच्या बैठकीवर सत्ताधारी उगच टीका करतात. विरोधक बैठका घेऊ शकत नाहीत का असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच पाटण्याच्या बैठकीमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
बीआरएसवर प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पंढरपूरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्या पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. याचवेळी भगिरथ भालके हे भारत राष्ट्रसमितीमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीआरएसला राज्यात प्रतिसाद मिळेल की नाही हे भविष्यात कळेल. वेगळ राजकीय चित्र दाखवण्याचा केसीआर यांचा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.