जुन्या भांडणाच्या वादातून टेम्पो अंगावर घालून अल्पवयीन मुलाची चिरडून हत्या केल्याची घटना घडलीय. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश सातपुते असं मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाच नाव आहे. पोलिसांनी अविनाशच्या अंगावर टेम्पो घालून चिरडल्या प्रकरणी समीर मोहम्मद शेख,अनिकेत बाळू शिंदे, दिगंबर अनिल पांगारे, सुरज विलास पवार, तनवीर तानाजी पांगारे यांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आणि त्याचा मित्र यांचे आरोपी बरोबर जुने भांडण झाले होते. या जुन्या भांडणाच्या वादातून अंगावर टेम्पो घालून मारल्याचा प्रकार समोर आला आहे. भांडण मिटवायची आहेत, असे सांगून रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. मयत अविनाश हा त्याच्या मित्रांसोबत पहाटे रस्त्यावर उभा होता. त्यावेळी वाद मिटवायचाय तू रस्त्यावर थांब असं म्हणत अविनाशला रस्त्यावर उभा राहण्यास सांगितलं. यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावर टेम्पो घातला त्यात अविनाशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.