भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचं ठरवलं आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची स्थिती असताना भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांत नेमकं काय-काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आता भारताने आणखी कठोर भूमिका घेतली असून भारतीय आर्मीला प्रत्युत्तर देण्यास खुली सूट देण्यात आली आहे.
समकक्ष अधिकाऱ्यांना दिला संदेश
भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय लष्कराच्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. “आज मी पाकिस्तानच्या माझ्या समकक्ष अधिकाऱ्याला संदेश दिला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे होत असलेल्या उल्लंघनाबाबत आम्ही त्यांचे लक्ष वेधले आहे. 10 मे रोजी झालेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याचेही आम्ही त्यांना सांगितले,” अशी माहिती राजीव घई यांनी दिली.
कमांडर्सना पूर्णपणे सूट दिली
तसेच, लष्कराच्या प्रमुखांनी (चिफ ऑफ आर्मी स्टाफ) आज एक आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत सुरक्षेचा आढवा घेण्यात आला. तसेच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे कोणत्याही पद्धतीने उल्लंघन झाल्यास लष्कर प्रमुखांनी कमांडर्सना प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सूट दिलेली आहे, असेही राजीव घई यांनी सांगितले.
…तर चोख प्रत्युत्तर देऊ
दरम्यान, पत्रकार परिषदेच्या शेवटी राजीव घई शेवटी पाकिस्तानसोबतच्या तणावात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रती तसेच शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांचा त्याग हा कायम लक्षात ठेवला जाईल. भारताच्या अखंडतेला, नागरिकांना धोका पोहोचवला जात असेल तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असेही राजीव घई यांनी सांगितले.