Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरकरांना '२०२१'पेक्षा मोठ्या महापुराची धास्ती; धरणातील पाणीसाठा दुप्पट

कोल्हापूरकरांना ‘२०२१’पेक्षा मोठ्या महापुराची धास्ती; धरणातील पाणीसाठा दुप्पट

यंदा मान्सूनपूर्व पावसाने झोडपलेच त्याचबरोबर मान्सूनने जोरदार एंट्री केल्याने गेल्या २४ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाचा जोर पाहता २०२१ ची आठवण कोल्हापूरकरांना येत असून, त्यावेळी ३५० मिलीमीटर पाऊस झाला होता.

 

मात्र, धरणातील पाणीसाठा आतापेक्षा निम्मा होता. त्यामुळे यंदा २०२१ पेक्षाही अधिक महापुराची धास्ती कोल्हापूरकरांना राहणार आहे.

 

पावसाळा आला की, कोल्हापूरकरांच्या अंगावर काटा येतो. साधारणत: जून महिन्यात उघडझाप राहून महिन्याच्या सरासरी पेक्षा निम्मा पाऊस पडतो. पण, यंदा वरुणराजाच्या मनात काही वेगळेच दिसत आहे. जून महिन्याची सरासरी २९० मिलीमीटर आहे. महिना संपायला अजून सहा दिवस आहेत, तोपर्यंत जूनची सरासरी ओलांडून पुढे गेली आहे. मागील तीन वर्षांपेक्षा तिप्पट पाऊस आहे. २०२१ मध्ये असाच पाऊस झाला होता. त्यात धरणातील साठा त्यापेक्षा दुप्पट असल्याने कोल्हापूरकरांच्या पोटात जून महिन्यातच गोळा आला आहे.

 

पाटबंधारे विभागाची कसोटी

 

जूनमधील धरणातील पाणीसाठा, आगामी तीन महिने पडणारा संभाव्य पाऊस याचा ताळमेळ घालून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने आतापासूनच विसर्ग सुरू केला असला, तरी आगामी काळ कसोटीचा राहणार आहे.

 

गेल्या पाच वर्षांतील २४ जूनपर्यंतचा पाऊस, मिलीमीटरमध्ये

 

वर्ष – सरासरी पाऊस – पंचगंगेची पातळी फुटात

२०२१ – ३५०.० – १७.३

२०२२ – ८१.७ – ८.०५

२०२३ – १५.८ – ८.१९

२०२४ – १४१.० – १३.५

२०२५ – ३०१.२ – २९.८

 

प्रमुख धरणातील २४ जून अखेरचा पाणीसाठा, टीएमसी..

 

धरण – २०२१ – २०२५

राधानगरी – ३.१५ – ५.२५

वारणा – १८.१६ – २०.३४

दूधगंगा – ९.८१ – ८.१५

कासारी – १.०५ – १.१८

कडवी – १.१२ – १.४४

कुंभी – १.३६ – १.५७

पाटगाव – १.७८ – २.३३

घटप्रभा – १.५२ – १.५६

 

यावर्षी बालिंगे पुलाशेजारी टाकलेल्या भरावामुळे आरे परिसराला महापुराचा धोका अधिक आहे. त्यात, जूनपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी आतापासूनच धसका घेतला आहे. – पी. डी. पाटील (ग्रामस्थ, आरे)

 

जून महिन्यातच पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे, सध्याचा पाऊस बघता यंदा खूप वाईट अवस्था होणार आहे. प्रयाग चिखली ग्रामस्थांना सोनतळी येथे प्लॉट दिले असले तरी कुटुंबांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे ४०० कुटुंबांना प्लॉटची गरज आहे. – विठ्ठल कळके (सदस्य, ग्रा. पं. प्रयाग चिखली)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -