राज्यात गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने छापे टाकले आहेत. या छाप्यामध्ये एसआयटीला मोठे यश मिळाले आहे. नागपूर येथील शिक्षण संस्था संचालक ओंकार भाऊराव अंजीकर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या तीन शाळांवर एसआयटीने छापे टाकले. या छाप्यांमध्ये काही शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस आढळले आहे. २०१९ पासून अंजीकर यांनी साधारण ३० शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप आहे.
एसआयटीकडून कागदपत्रे जप्त
शांती निकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक असलेले ओंकार भाऊराव अंजीकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या शांती निकेतन शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत जय हिंद उच्च प्राथमिक विद्यालय चालवले जाते. एसआयटीने गुलशन नगर येथील जय हिंद विद्यालय येथे छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासणी दरम्यान काही शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचे आढळून आले.
एसआयटीच्या छाप्यानंतर शांतीनिकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक ओंकार भाऊराव अंजीकरचे पाय आणखी खोलात असल्याचे समोर आले आहे. अंजीकर यांनी त्यांच्या संस्थेचे बनावट लेटरहेड वापरुन अपात्र मुख्याध्यापक पराग पुडके यांना पद मिळवल्याची तक्रार केली होती. परंतु आता ते स्वत: एसआयटीच्या चौकशीत अडकले आहेत. अंजीकर यांच्या संस्थेमार्फत तीन शाळा चालवल्या जातात.
अनेक जण अडकणार
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात गाजलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये पोलिसांकडून अपात्र संस्थाचालकांवर अटकेची कारवाई सुरू झाली आहे. तसेच या प्रकरणात शिक्षण विभागातील तत्कालीन कर्मचारी अडकणार आहेत. त्यात शिक्षणाधिकारी, क्लार्क, वेतन अधीक्षक यांच्यासह इतर काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात नियमाप्रमाणे प्रक्रिया न करताच शालार्थ आयडी दिले. त्यामुळे 650 शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असण्याची दाट शक्यता पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी व्यक्त केली.