कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत पूरस्थितीची पाहणी केली. नारायणस्वामी मंदिरात असणाऱ्या उत्सवमूतीचे त्यांनी दर्शन घेतले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला असून पुढील १८ तासांत पाणीपातळी स्थिर होईल. मात्र, नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
कोल्हापूरचे प्रशासन कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. तसेच राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी हळूहळू स्थिरावत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. याच बरोबर मंदिर प्रशासन व ग्रामपंचायतीला सावधातनेच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, मंडल अधिकारी अमितकुमार पाडळकर, देवस्थान अध्यक्ष वैभव पुजारी, सरपंच चेतन गवळी, सदस्य धनाजीराव जगदाळे, संजय उर्फ सोनू पुजारी आदी उपस्थित होते.
गुडघाभर पाण्यातूनच श्रींचे दर्शन
दरम्यान, आज सकाळपासून कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत संथ वाढ होत असून गुडघाभर पाण्यातूनच भाविक दत्त दर्शन घेत आहे. श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर पाणी आले असून अशीच वाढ होत राहिल्यास मूर्ती टेंबे स्वामी मठात न्यावी लागणार आहे.
प्रशासनाच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन करावे,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. पूरबाधित झालेल्या भागातील लोकांनी तातडीने स्थलांतर करावे. पुराच्या पाण्यात नागरिकांनी वाहने चालवू नयेत. गरज असल्यास घराबाहेर पडावे. नदीकाठालगत पाणी पाहण्यास जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.