Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रतीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?

तीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?

आजपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या ‘मधुशाला’ बंद राहणार आहेत. आजपासून पुढील तीन दिवस तळीरामांचे हाल होणार असून ड्राय डे असणार आहे. गुरुवारी, राज्यातील २९ महापालिकांमध्ये होणाऱ्या मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असणार आहे.

 

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा थरार शिगेला पोहोचला असतानाच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज, बुधवार (१४ जानेवारी) पासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत संबंधित महापालिका क्षेत्रांत ‘ड्राय डे’ (मद्यविक्री बंद) जाहीर करण्यात आला आहे.

कधीपर्यंत राहणार बंदी?

 

 

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने मद्यविक्रीवर कडक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार १४ जानेवारी बुधवारी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद असणार आहे. तर, गुरुवारी १५ जानेवारी रोजी मतदान दिवस आहे. त्यामुळे मतदानानिमित्त दिवसभर दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार आहे. तर, महापालिका निवडणुकीची मतमोजणी ही शुक्रवारी १६ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाइन शॉप, बार अँड रेस्टोरंट्स बंद राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजल्यानंतर तळीरामांना गळा ओला करता येणार आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आहे. केवळ वाईन शॉप्सच नव्हे, तर बार, परमिट रूम आणि बिअर शॉपी देखील या काळात पूर्णपणे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर आणि बेकायदेशीररीत्या मद्यसाठा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

का घेतला हा निर्णय?

 

 

निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारूचा वापर होण्याची शक्यता असते. तसेच, मद्यप्राशनामुळे वादाचे प्रसंग उद्भवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने हा ‘तीन दिवसांचा ड्राय डे’ जाहीर केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -