हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील छैंसा गावात सातत्याने होणाऱ्या मृत्यूंमुळे आता परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, लोक या गावात जाण्यास घाबरू लागले आहेत. अनेकजण या गावाला ‘मृत्यूचं गाव’ म्हणून संबोधत आहेत.
गावात सध्या हेल्थ इमर्जन्सीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या दोन आठवड्यांत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी अनेक जणांना ‘हेपेटायटीस-बी’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने गावात आरोग्य शिबिर लावून मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम सुरू केली आहे.
सातत्याने होणाऱ्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाचं पथक घरोघरी जाऊन लोकांच्या रक्ताचे नमुने घेत आहे. हे नमुने कावीळ, हेपेटायटीस-बी आणि हेपेटायटीस-सी च्या तपासणीसाठी पाठवलं जात आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे, त्यांना संसर्ग रोखण्यासाठी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं जात आहे. सुरुवातीला रुग्णांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणं दिसतात, त्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर होत जाते.
आरोग्य शिबिराचे नोडल अधिकारी वासुदेव गुप्ता यांच्या मते, हेपेटायटीस-बी हा संसर्ग दूषित रक्त, संक्रमित सुईचा वापर आणि शरीरसंबंधांमुळे पसरतो. नशेसाठी सामायिक सुईचा वापर केल्यामुळे काही प्रकरणं समोर आली असावीत, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर काही प्रकरणांचा संबंध स्थलांतरित मजूर आणि ट्रक चालकांच्या ‘हाय रिस्क’ वर्तणुकीशी असू शकतो. प्रशासन सध्या गावात जनजागृती मोहीम राबवत असून लोकांना तपासणीसाठी प्रोत्साहित करत आहे.
गावातील नागरिक या आजारामागे दूषित पाणी हे मुख्य कारण असल्याचं मानत आहेत. गुरुग्राम कालव्यातील औद्योगिक कचऱ्यामुळे पाणी दूषित झालं असून त्यामुळेच लोक आजारी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र प्रशासनाने अद्याप दूषित पाण्यामुळे आजार पसरल्याच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही, यावर तपास सुरू आहे.
गावातील १४ वर्षांच्या सारिक नावाच्या मुलाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि आयसीयू (ICU) बेडच्या कमतरतेमुळे त्याची प्रकृती खालावली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. प्रशासनासमोर आता दुहेरी आव्हान आहे. एकीकडे हेपेटायटीसचा संसर्ग रोखणं आणि दुसरीकडे दूषित पाणी व आरोग्य सेवांबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींचं निवारण करणं. सध्या गावात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम सुरू असून आरोग्य विभाग परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.





