Thursday, May 28, 2026
Homeब्रेकिंगराज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागांमध्ये गारपीट, अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा...

राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागांमध्ये गारपीट, अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

आज पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकासन झालं आहे. तसेच अंगावर वीज पडल्यानं संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 

संगमनेर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याचदरम्यान अंगवार वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गिर्हेवाडी येथील रहिवासी असलेलेले शेतकरी मच्छिंद्र झुंबर दुधवडे (वय ३५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तालुक्यातील साकूरसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं.

 

जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा

 

जालना जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी सर्व दूर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी पत्रे उडाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. बदनापूर तालुक्यातल्या वंजारवाडी, साखरवाडी कंडारी यासह आसपासच्या परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.

 

हिंगोली जिल्हयातही पाऊस

 

दरम्यान दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात देखील आज अनेक ठाकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने गोरेगाव – कडोळी मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या पावसामुळे जमीन भिजल्याने आता खरीपपूर्व मशागतीच्या कामाला वेग येणार आहे.

 

वाशिममध्येही पाऊस

 

वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव फाटा परिसरात आज सायंकाळी अचानक झालेल्या गारपीट आणि जोरदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -