शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयांना 2000 रुपये प्रति हप्ता या प्रमाणे 3 टप्प्यात 6000 रुपयांचा लाभ दरवर्षी दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी यावर्षी 80 टक्के लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’द्वारे नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हंटले आहे की, जिह्यात या योजनेसाठी आजअखेर एकूण 5,60,671 इतक्या शेतकरी कुटुंबांची पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी झाली आहे. यापैकी आधार प्रमाणीकरण झालेली एकूण लाभार्थी संख्या 5, 06, 101 इतकी आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या या योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकयांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. सध्या जिह्यात 80 टक्के ईकेवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
उर्वरित लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुरू ठेवणेसाठी ईकेवायसी प्रमाणीकरण लवकरात लवकर स्वतः पी. एम. किसान ऍप द्वारे अथवा ग्राहक सेवा केंद्र (सी.एस. सी) मार्फत करून घेणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जिह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकर्यांना खालीलप्रमाणे ई-केवायसी करण्यासाठी ‘ओटीपी’ किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
‘पीएम किसान’ https://pmkisan.gov.in
या
वेबसाईटवरील Farmer Corner मध्ये किंवा पी. एम. किसान ऍप द्वारे ‘ओटीपी’ द्वारे लाभार्थीना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (सी.एस.सी) केंद्रावर ईकेवायसी प्रमाणीकरण बायोमेट्रिक पद्धतीने करता येईल. पी. एम. किमान योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील ऑगस्ट नोव्हेंबर 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यासाठी ईकेवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया गरजेची असून लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण करावी. ई-केवायसी पूर्ण न झालेस शेतकरी सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.