चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने पु्न्हा एकदा हाहाकार उडवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच कानपूर आयआयटीने दिलेल्या चौथ्या लाटेच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिका (BMC) सतर्क झाली आहे.
जम्बो कोविड सेंटर्स बंद झाल्याची चर्चा BMC चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी फेटाळून लावली. चीनमध्ये कोरोना झपाट्याने पसरल असल्याचे पाहून मुंबईतील कोविड सेंटर्स अद्याप बंद करण्यात आलेली नाहीत, असे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहेत.
आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, की मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट झाली आहे. रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. त्यामुळे शहरात बांधलेल्या एकूण 9 जम्बो कोविड केंद्रांपैकी 6 बंद करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु अद्याप शहरात बांधलेले एकही कोविड केंद्र बंद झालेले नाही. टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटर सुरू ठेवायचे की बंद करायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
आयुक्त म्हणाले, मुंबईतील कोरोनाविरुद्धच्या लढाईत जंबो कोविड सेंटरचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. परंतु चौथ्या लाटेची भीती नाकारता येत नाही त्यामुळे 9 पैकी 3 कोविड सेंटर्स सुरु ठेवण्यात आले आहेत. तर उरलेले 6 जम्बो सेंटर्स ‘स्टँडबाय मोड’वर ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, गुढीपाडव्यापासून राज्यभरात कोविड निर्बंध शंभर टक्के शिथिल करण्यात आले आहे. सोबतच मास्कमुक्ती केल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुंबईत मास्कशिवाय फिरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले आहे. परंतु अद्याप कोविड-19 चा संसर्ग संपलेला नाही, लोकांना स्वेच्छेने मास्क वापरण्याचे आवाहन BMC ने केले आहे.