सोलापूर जिल्हातील सांगोला येथे 10 वी बोर्ड परीक्षेबाबत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. सांगोल्यातील एका शाळेत ठेवलेल्या स्ट्राँग रूममधून परीक्षेपूर्वी भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.
प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशीच हा प्रकार घडल्याने विद्यार्थी, पालक आणि प्रशासनात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
स्टाँग रुममध्ये भूगोलाच्या पेपरचे 50 प्रश्नपत्रिकांचे बंडल ठेवण्यात आले होते, मात्र काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि हे प्रश्नपत्रिकेचे बंडल लंपास केले. विशेष म्हणजे भूगोलाच्या पेपरच्या आदल्या दिवशी हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
बोर्डचे पेपर सुरक्षित राहावे म्हणून त्या स्टाँग रुममध्ये ठेवण्यात येतात, मात्र अशा पद्धतीने पेपर चोरीला जात असतील तर विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसापूर्वी 12 वीच्या परिक्षेवेळीही पेपर फुटीची घटना घडली होती. त्यानंतर आता 10 वीचा पेपर चोरीला गेल्याने यामागे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे. कडक सुरक्षा असतानाही असा प्रकारची घटना घडल्याने प्रशासनावरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, उद्या होणाऱ्या 10 वीच्या भूगोल परीक्षेवर या घटनेचा परिणाम होणार का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परीक्षा पुढे ढकलली जाणार की नियोजित वेळापत्रकानुसारच होणार, याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून लवकरच जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



