अमरावती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य शरद पवार मंचावर बसलेले असतानाच केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पद असणाऱ्या शिवसेनेने या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळेच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील धुसपूस थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचली आहे.
रविवारी शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शरद पवारांबरोबरच या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठे वक्तव्य केले.
शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता, तर महाराष्ट्राचे चित्र अजून वेगळं असते, असे यशोमती ठाकूर म्हणाल्यानंतर काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर पुन्हा बोलताना, टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पवारांसाठी जोरात टाळ्या वाजवा, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले, पण आज काळाची गरज आहे. जेव्हा महाविकास आघाडी झाली, तेव्हा पवार मला म्हणाले होते, मी ऐकले तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितले नव्हते. पण या ठिकाणी पवार आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थिर राहणार असे या ठिकाणी मी सांगते, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका मांडताना पक्षाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया व्हिडीओ रात्री पावणे अकराच्या सुमारास जारी केली. यामध्ये नीलम गोऱ्हे यांनी खोचकपद्धतीने शिवसेनेच्या राष्ट्रवादीला टोला लगावला. आज नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असे वक्तव्य केले आहे की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, तर वेगळे चित्र दिसले असते. शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नसल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. तसेच पुढे बोलताना, मला तर वाटते त्यांना युपीएचे अध्यक्ष करावे, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल, असा टोला नीलम गोऱ्हेंनी लागवला आहे. त्याचप्रमाणे, यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का? असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिक्रियेच्या शेवटी विचारला आहे.