ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशात दिल्लीसह काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमिवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क अनिवार्य केले जाऊ शकते असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बुधवारी दिले. खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क आवश्यक करता येऊ शकतात, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरच मास्कच्या आवश्यकतेबाबत निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री म्हणाले की आज मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याचे आदेश देऊ शकतात. या बैठकीनंतरच अंतिम निर्णय होणार आहे. कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर कोविडच्या टेस्टिंगचा वेग अधिक तीव्र केला जाईल. ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट वाढवले जाईल. तसेच ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी ते वाढवले जाईल असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच 6 ते 12 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल अशी माहिती देखील यावेळी टोपेंनी दिली.