घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलसह वाढत्या महागाईविरोधात विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी आंदोलने करण्यात आली. सायकल रॅली, निदर्शने, मोर्चांतून आंदोलकांनी आक्रोश व्यक्त केला. महागाईवर नियंत्रणात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तळपत्या उन्हात शहरातील बिंदू चौक, दसरा चौकात ही निदर्शने झाली.
मावळा कोल्हापूरच्या वतीने स्पीकरवर पंतप्रधानांचे भाषण लावून सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये शंभरहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला. सायकलींवर लावण्यात आलेल्या फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘महागाई वाढवणार्या केंद्र सरकारचा धिक्कार असो’, ‘पेट्रोल, डिझेल भाववाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘भाषण नको, राशन द्या’, ‘अच्छे दिन आयेंगे, लेकिन तारीख नहीं बतायेंगे’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा विजय असो’ आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी अमित कांबळे, संजय जाधव, मुकुंद कदम, राहुल भोई, अनिकेत सावंत, गंगुबाई जाधव, आबाजी पाटील, ओंकार नलवडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. उद्योग-धंदे बंद आहेत. लाखो लोक रोजगाराला मुकले आहेत. अतिशय बिकट परिस्थितीतून लोक जात असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने इंधन दरवाढ केल्याने महागाई भरमसाट वाढली आहे. यावर तत्काळ नियंत्रण आणावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन जिल्हाधिकार्यांळना देण्यात आले. यावेळी डी. जी. भास्कर, डॉ. नंदकुमार गोंधळी, सोमनाथ घोडेराव, अब्बास शेख, सुरेश सावर्डेकर, वाय. के. कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महागाईविरोधी नागरी जनआंदोलन समितीतर्फे बिंदू चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी आमदार संपत बापू पवार म्हणाले, पेट्रोल, डिझेल, वीज, अन्नधान्य, भाजीपाल्याच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील बनले आहे. समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, संभाजी जगदाळे, सुमन पाटील, रामदास पाटील, व्यंकाप्पा भोसले, अतुल दिघे, रुपेश पाटील, बाबासाहेब देवकर यांची भाषणे झाली.





