कोल्हापूर शहरातील गावठाणात तब्बल 34 इमारती धोकादायक आहेत. सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने संबंधित इमारती रिकाम्या करण्याची सूचना संबंधितांना नोटिसीद्वारे दिल्या आहेत. यात महाद्वार रोड, महालक्ष्मी मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, ताराबाई रोड येथील इमारतींचा समावेश आहे. त्याबाबत मालक व कूळ यांच्यातील वाद व न्यायालयीन खटले सुरू आहेत.
विभागीय कार्यालय क्र. 2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत 134 धोकादायक इमारती आहेत. यापैकी 86 धोकादायक इमारतींवर कारवाई करून त्या दुरुस्त, नवीन बांधकामे करून घेण्यात आली. उर्वरित 36 इमारतींमध्ये कूळ-मालक वाद असल्याने व 11 इमारतींबाबत न्यायालयात खटले सुरू असल्याने त्या रिकाम्या करता आल्या नाहीत. अतिवृष्टीमुळे या इमारतींना धोका निर्माण होऊन कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी 34 धोकादायक इमारतींना बुधवारी त्या रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी व्हिडीओ शूटिंग करून नागरिकांना घर रिकामे करून निवारा केंद्राच्या ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले.