मागच्या दोन आठवड्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील सगळ्याच नद्या इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहेत.
दरम्यान सांगली जिल्ह्यीतही पावसाने थैमान घातल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान 2019 आणि 2021 साली समन्वयाच्या अभावाने अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग न झाल्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा फटका बसला होता. यंदा मात्र पुराचा धोका बसू नये म्हणून अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे अलमट्टी धरणातून आज (दि.16) सकाळपासून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेले तीन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग सव्वा लाख क्युसेक सुरू ठेवण्यात आला होता. यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे.
या धरणाची क्षमता 123 टीएमसी असून, सध्या या धरणांमध्ये 87.992 टीएमसी म्हणजे 71 टक्के पाणीसाठा आहे. सध्या या धरणांमध्ये एक लाख 29 हजार 872 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणी विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे धरणाच्या पायथ्याच्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने सूचना केल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 67.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 67.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले-7.4 मिमी, शिरोळ -7.5 मिमी, पन्हाळा- 27.7 मिमी, शाहूवाडी- 23.6 मिमी, राधानगरी- 39.9 मिमी, गगनबावडा-67.8 मिमी, करवीर- 18 मिमी, कागल- 15.6 मिमी, गडहिंग्लज- 19.5 मिमी, भुदरगड- 40.1 मिमी, आजरा-47.9 मिमी, चंदगड- 51.3 मिमी, असा एकूण 25.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.