ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यास महापुराचा
धोका निर्माण करणारे कर्नाटकातील 123 टीएमसीचे अलमट्टी धरण शंभर टीएमसी भरले आहे. पावसाळा अद्यापही दोन महिने बाकी आहे,
त्यामुळे कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रातील धरणे व अलमट्टीतून विसर्गाचे योग्य नियोजन करणे गरजेचे बनले आहे. दरम्यान, आज धरण परिसरात व जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. वातावरण ढगाळ होते.
जिल्ह्यात मंगळवार, दि. 5 ते मंगळवार, दि. 19 असा सलग पंधरा दिवस पाऊस पडला. त्यानंतर गेली आठवडाभर पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे नद्यांचा पूर ओसरला आहे. जिल्ह्याचा महापुराचा धोका तुर्तास टळला आहे. मात्र रविवारपासून पुन्हा वातावरण बदलले आहे. सोमवारी शिराळा, वाळवा, सांगली, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात रिमझिम पाऊस पडला. याबरोबरच धरण परिसरात मध्यम पाऊस सुरू झाला आहे. कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 42 व सोमवारी दिवसभरात 6 मिमी पाऊस पडला. नवजा येथेही वरीलप्रमाणे अनुक्रमे 58 व 5 तर महाबळेश्वर येथे 45 व 5 मिमी पाऊस झाला. धोम येथे 2 व कण्हेरला 12 मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरण 64 टीएमसी भरले आहे.
या धरणातून 2100 क्युसेक विसर्ग केला जात आहे. धोम 8.66 व कण्हेर धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरण 26.70 टीएमसी भरले आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 8.5 फूट आहे.