कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराला कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यापार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला धरणसाठ्यात होणारी आवक लक्षात घेत विसर्ग वाढवा असा आदेश दिला आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. यामुळे अलमट्टी धरणातून कालपर्यंत अंदाजे २ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवला होता. दरम्यान आज सकाळी पुन्हा २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नद्यांमधून, जलाशयातून १ लाख ८० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. अलमट्टी धरणातून २ लाख २५ हजार क्युसेक्स तर घटप्रभा जलाशयातून १०००० क्युसेकचा नियंत्रित विसर्ग सध्या ८० टक्के क्षमतेवर सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीतीरावरील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यासह पूरग्रस्त भागासाठी सर्व तहसीलदारांना नियोजित ४२७ ठिकाणी निवारा केंद्रे स्थापन झाल्याबद्दल शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य पुरस्थितीसाठी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाच बोटी खरेदी आणि सर्चलाइट्स उपलब्ध करून देण्याच्या योजनांसह बोटी सज्ज ठेवाव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत.





