कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी पोलिसांना मिळाली आहे. मंगळवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन पोलिसांनी ही धमकी दिली. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर पोलील आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेत बॉम्बचा शोध घेतला. यामुळे रेल्वे स्थानकात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी मध्यरात्री १ च्या सुमारास उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात एक फोन आला. यावेळी गणेश सर्जेराव मोरे हे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. त्यांनी तो फोन उचलला. यानंतर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरुन बोलतोय असे सांगितले. आम्ही कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला आहे. आता लगेचच आम्ही कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोनवरुन दिली. यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मोठी धावपळ सुरु झाली.
त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले. तब्बल तीन ते चार तास कल्याण स्थानकात सर्च ऑपरेशन करण्यात आहे. मात्र त्यानंतर फोनवरुन बॉम्बची अफवा देण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना
या प्रकरणाचा तपास सुरू असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. अशा धोकादायक अफवांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या कल्याण रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही या आलेल्या कॉलचा तपास करत आहोत. यानंतर आता पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.