महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. यंदाच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज्यात सत्ता आल्यानंतरही महायुतीत सातत्याने काही ना काही कारणामुळे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीतील तीन घटक पक्षात या ना त्या कारणाने राजकीय कुरघोडी सुरु असतात. तसेच पालकमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. त्यातच आता एका बड्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेनेबद्दल मोठे भाकीत केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध राजकीय घटनांबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आले. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरबद्दलही विचारण्यात आले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं काम तमाम होणार आहे. शिंदे गट हा लवकरच भाजपाच विलीन होईल, असे भाकीत वर्तवले.
एकनाथ शिंदेंचे काम तमाम होणार
“एक दिवस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. 2029 ला चित्र पूर्ण बदललेले असेल. भाजप आणि एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाहीत. एकनाथ शिंदेंचे काम झालेले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचे काम तमाम होणार आहे, हे आता सर्वांना दिसत आहे. हे त्यांनाही माहिती आहे, त्यांच्या लोकांनाही माहिती आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल. हे तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. मी तुम्हाला सही देतो”, असे संजय राऊत म्हणाले.
लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत
“जे कोणी पक्ष सोडतायत ते पदाधिकारी आहेत. पुढल्या दोन दिवसांत आमची बैठक आहे. आम्ही काही जणांना नव्याने जबाबदाऱ्या देणार आहोत. आम्ही खचणारे लोक नाहीत. जाणारे जावू द्या. सत्ता, पैसा दबाव आहे. काहीतरी अडचणी आहेत. जुन्या केसेस काढल्या जातात. काही लोकांची मने कमकुवत झाली आहेत. लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत. मुर्दाड लोकांना ठेवून तर काय करायचे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.