महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली आहे. परीक्षेत पहिल्याच दिवशी मराठी भाषेचा पेपर होता. हा पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर आणि यवतमाळ जिल्हयातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या आल्या. त्यावर मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेली प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिका यांच्यात खूप फरक असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटीची बातमी वृत्तवाहिन्यांवर प्रसिध्द झाली. त्याअनुषंगाने मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी केली असता दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून अन्य खाजगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली दिसून आली. तसेच काही हस्तलिखित मजकूराची पानेही आढळून आली. त्यामध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे हस्तलिखितामध्ये आढळून आली. परंतु ही प्रश्नपत्रिका नाही. काही गैरप्रकार करण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व उत्तरे व्हायरल केल्याचे दिसून येते. या घटनेची गांभीर्याने नोंद घेवून जिल्हा प्रशासनाने याबाबत सविस्तर चौकशी अहवाल मागवला आहे.
यवतमाळमध्ये काय घडले?
यवतमाळ जिल्हयातील महागाव कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी (प्रथम भाषा) विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलव्दारे व्हायरल झाली, अशा पध्दतीच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याबाबत संबंधितांकडून या घटनेचा सविस्तर अहवाल घेण्यात आला आहे. या ठिकाणीसुद्धा प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून येते. या प्रकरणात दोषी व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जालना जिल्हयातील जिल्हा परिषद प्रशाला, तळणी, ता.मंठा, जि. जालना, केंद्र कमांक ३४३६ या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती, पोलीसांच्या मदतीने पालकांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी बाहेर काढण्यात आले. या ठिकाणी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.