महाराष्ट्रात आजही खासगी सावकाराकडून कर्ज घेणाऱ्यांची कमी नाही . कर्जाचा डोंगर वाढला की सावकाराचा तगादा सुरू होतो आणि इकडे आड अन् तिकडे विहीर अशी अवस्था होते . कल्याणमध्ये खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकलेल्या रिक्षा चालकांना टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे . आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या शाळेची फीस भरण्यासाठी विजय जीवन मोरे या रिक्षाचालकानं खासगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेतलं . व्याजाचे पैसे वेळेत चुकते न केल्याने सावकाराने पैशाचा तगादा लावत दमदाटी करायला सुरुवात केली . सावकाराच्या जाचाला कंटाळून अखेर रिक्षा चालकाने सुसाईड नोट ठेवत आत्महत्या केली आहे .या घटनेनंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे .
नक्की घडले काय ?
सावकाराच्या जाचाला कंटाळून कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाने आत्महत्या केली आहे .विजय जीवन मोरे असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे .रिक्षाचालक विजय मोरे यांचा मुलगा दहावीच शिकत होता .दहावीची परीक्षा असल्याने शाळेची राहिलेली फीस भरण्यासाठी शाळा तगादा लावत होती .शाळेची फीस भरा अन्यथा हॉल तिकीट मिळणार नाही या भीतीपोटी विजय मोरे यांनी एका खाजगी सावकाराकडून शाळेची फीस भरण्यासाठी व्याजाने कर्ज घेतले .मात्र व्याजाचे पैसे वेळेत चुकते न झाल्याने सावकाराकडून पैशाचा तगादा सुरू झाला .
या सावकाराने घरी येऊन दमदाटी केल्याचा आरोप ही मृत विजय मोरे यांचे भाऊ राजू मोरे यांनी केला आहे .खाजगी सावकाराने पैशाचा तगादा लावला होता .सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालक विजय मोरे यांनी आत्महत्या केली .आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवली होती यात माझ्यावर कर्जदाराकडून खूप छळ केला जातो त्यामुळे माझ्या घराला उपाशी मरायची पाळी आली आहे .माझ्या आत्महत्येला कर्जदार दोषी असल्याचं विजय मोरे यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवला आहे .