कौटुंबिक वादातून माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या पतीचे पत्नी आणि सासूसोबत भांडण झाले. पत्नी यायला तयार नसल्याने संतापलेल्या पतीने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले आणि पत्नी आणि सासूला मिठ्या मारत स्वतःसोबत त्यांनादेखील संपवून टाकण्याचा प्रयत्न केला.
सोनारी (ता. सिन्नर) येथे सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेत तीन जण गंभीर भाजले असून, पेटवून घेणाऱ्या पतीचा जिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता. ७) दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
केदारनाथ दशरथ हांडोरे (रा. शिंदेवाडी, पंचाळे) असे पतीचे नाव आहे. त्याचा वर्षभरापूर्वी नात्यातीलच असलेल्या स्नेहल सोमनाथ शिंदे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. केदारनाथ आणि स्नेहलचे वडील एकमेकांचेपान सख्खे मावसभाऊ होते. या नात्याचादेखील त्यांनी लग्न करताना विचार केला नव्हता.
लग्नानंतर त्यांच्यात भांडणे होत असल्याने महिनाभरापूर्वी स्नेहल माहेरी सोनारी येथे आई-वडिलांकडे निघून आली होती. तिला परत आणण्यासाठी रविवारी (ता. ६) रात्री केदारनाथ आपल्या काही मित्रांना घेऊन सासुरवाडीला गेला होता. पत्नी सोबत यायला तयार नव्हती. सासूचा तिला सोबत पाठवायला विरोध होता, त्यामुळे संतप्त झालेल्या केदारनाथने घरातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. स्वतः संपायचेच पण पत्नी आणि सासूलादेखील ठार करायचे या प्रयत्नातून त्याने दोघींनाही मिठ्या मारून पकडून ठेवले. दोघींचा आरडाओरडा ऐकल्यावर आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली.
तिघांच्याही अंगावरील कपड्यांनी पेट घेऊन ते काही प्रमाणात भाजले होते. त्यांना त्या अवस्थेत उपचारासाठी नाशिकला नेण्यात आले. केदारनाथची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात, तर पत्नी स्नेहल व सासू अनिता यांना नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी (ता. ७) दुपारी केदारनाथचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
स्नेहलच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी केदारनाथ व त्याच्यासोबत आलेल्या चौघा मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘केदारनाथ व त्याचे मित्र हरीश डुंबरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात, विशाल तुपसुंदर यांनी मला व आईला चाकूचा धाक दाखवून धमकावले, धक्काबुक्की केली’ असे स्नेहलने फिर्यादीत म्हटले आहे.
अपहरण करण्याचा प्रयत्न?
दोन आठवड्यांपूर्वी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पतीने त्याच्या मित्रांच्या मदतीने सासूला मारहाण करत पत्नीचे अपहरण केले होते. त्याच पद्धतीने स्नेहलचे अपहरण करण्याचा केदारनाथचा प्रयत्न असावा. त्याच्यासोबत आलेले मित्रदेखील त्याच तयारीत होते. मात्र आई आणि मुलीने केलेल्या विरोधापुढे त्यांचे काही चालले नाही. त्यामुळे केदारनाथने टोकाचे पाऊल उचलत स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला असावा व पत्नी आणि सासूदेखील जिवंत राहू नये म्हणून पेटवून घेतल्यावर त्यांना मिठ्या मारल्या असाव्यात असा अंदाज आहे.