कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून कोकणातून कोल्हापूरच्या दिशेने चिरा भरलेला ट्रक घेऊन जात असताना वळण घेताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रक ४० फूट दरीत कोसळला.
या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंड येथील वळणावर घडलीरवींद्र शिवाजी चव्हाण (वय ३५, रा. माले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे या ट्रकचालकाचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेला मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वळणावरील तीव्र उतार कारणीभूत असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची नोंद शाहुवाडी पोलीस ठाणे झाली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.