महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने गेल्या दोन आठवड्यापूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला होता. (process)निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेचा आराखडा जाहीर करण्यात आला होता. परंतु, या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सुरू झालेला गोंधळ विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण घालणारा ठरतो आहे. प्रवेशासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली सुरळीत सुरू न झाल्याने शालेय शिक्षण विभागाला नवं वेळापत्रक जाहीर करावं लागलं आहे सुरुवातीला 21 मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, 21 आणि 22 मे रोजीदेखील ही प्रक्रिया सुरू न होऊ शकल्याने अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर शिक्षण विभागाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया आता 26 मे 2025 पासून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून या कालावधीत त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालयांची निवड करता येणार आहे. म्हणजेच 9 दिवसांची मुदत त्यांना दिली जाणार आहे. त्यानंतर 5 जून रोजी पहिली मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. (process)यामध्ये जर कोणाला हरकत नोंदवायची असेल, तर त्यासाठी 6 व 7 जून या दोन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर 8 जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
यंदा ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन राबवली जात आहे. एकाच अर्जाच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ही प्रणाली विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी राबवली जात असली, तरी प्रत्यक्षात सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. (process)संकेतस्थळ उघडत नसणं, अर्ज सबमिट होत नसणं, माहिती चुकीची दिसणं अशा अनेक समस्या पहिल्याच दिवशी समोर आल्या. त्यामुळे आता 26 मेपासून प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह पालकांनाही आहे. तांत्रिक त्रुटींचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंत्रणांनी दक्षता घेणं आवश्यक ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देत माहिती अद्ययावत ठेवावी, असं आवाहन शालेय शिक्षण विभागाने केलं आहे.