Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रदुर्दैवी घटना! 'शेळ्या राखणारा मुलगा ट्रकच्या धडकेत ठार'; अन् कुटुंबाचा आधारच हरपला..

दुर्दैवी घटना! ‘शेळ्या राखणारा मुलगा ट्रकच्या धडकेत ठार’; अन् कुटुंबाचा आधारच हरपला..

केगाव-हत्तूर बायपासजवळ कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावाजवळील संत बाळूमामा मंदिर परिसरात शेळ्या राखणारा अल्पवयीन मुलगा ट्रकच्या धडकेत ठार झाला आहे. नैतिक राम माने (वय १७, रा.कवठे) असे मृताचे नाव आहे.

 

नैतिक सोमवारी शेळ्या घेऊन राखायला गेला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास हत्तूर-विजयपूर बायपासवर नैतिक शेळ्या राखत होता. अर्धा-एक तासात तो घरी जाणार होता. त्यावेळी काही शेळ्या महामार्गावर येत असल्याने त्यांना बाजूला करण्यासाठी नैतिक महामार्गाजवळून धावत होता. त्याचवेळी केगावकडून हत्तूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने नैतिकला जोरात धडक दिली. त्यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. अपघातात नैतिक जागीच ठार झाला.

 

अपघाताची माहिती मिळताच कवठे गावचे लोक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी सलगर वस्ती पोलिसांनाही माहिती दिली. अपघातानंतर ट्रक चालक वाहन जागीच सोडून पळून गेला होता. सलगर वस्ती पोलिसांनी नैतिकचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी सिव्हिलमध्ये हलविला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

 

नैतिकवर होती कुटुंबाची जबाबदारी

 

कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षण सोडून नैतिक हा शेळ्या राखून कुटुंबास मदत करीत होता. गावात त्याचे सलूनचे देखील काम करीत होता. त्याचे आई-वडील मिळेल ते काम करतात. नैतिकला एक भाऊ व बहीण असून नैतिक हा त्यांच्यात सर्वात लहान होता, पण खूप कष्टाळू होता. त्याचा कुटुंबाला मोठा आधार होता, असे गावकऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -