पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पुण्यासह मार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्त असून कोल्हापुरातूनही १६ अधिकाऱ्यांसह १५९ पोलिस रवाना झाले.
६ जुलैला आषाढीचा मुख्य सोहळा असून वेगवेगळ्या टप्प्यावर बंदोबस्त आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरकच्या दिशेने निघाले आहेत. देहू आणि आळंदीहून मानाच्या पालख्यांचे स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येते. पुढील १६ दिवसांचे नियोजन उत्तम होण्यासाठी राज्यभरातून पोलिस बंदोबस्त मागविला आहे. यात कोल्हापूर पोलिस दलाचाही मोलाचा वाटा आहे. शुक्रवारी रात्री हे पथक पुण्याकडे रवाना करण्यात आले. पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ९ पोलिस निरीक्षक, ७ उपनिरीक्षक, ५० पुरुष अंमलदार, ६० महिला अंमलदार, वाहतूक शाखेचे ९ अधिकारी व १५ पोलिस असा बंदोबस्त पंढरपूर बंदोबस्तासाठी पाठविला. या पथकातील कर्मचारी २८ जूनला परततील. तर त्यानंतर दुसरे पथक सातारा जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी पाठवले जाईल. तिसऱ्या टप्प्यातील पंढरपूरमधील बंदोबस्त ३ जुलैपासून आहे.