पूर्ववैमनस्यातून गांधीनगरात तरुणाचा खून केलेल्या आठजणांच्या टोळीतील पसार आरोपी संदेश अजय तायडे (वय १९, रा. गांधीनगर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर बाजार येथून बुधवारी (दि.२५) अटक केली. गेली पाच महिने तो मुंबई आणि कोलकाता येथे लपला होता. सदर बाजार येथे आजीला भेटायला येताच त्याला पोलिसांनी अटक केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी तायडे आणि त्याच्या सात साथीदारांनी १० जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गांधीनगरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ विठ्ठल ऊर्फ बबलू सुभाष शिंदे (वय २४, रा. कोयना वसाहत, गांधीनगर) याचा खून केला होता. त्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन मुलांसह सातजणांना पोलिसांनी अटक केली होती.
पसार झालेल्या तायडेचा गांधीनगर पोलिसांकडून शोध सुरू होता. तो सदर बाजार येथील त्याच्या आजीकडे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून तायडे याला अटक केली. खून करून पळाल्यानंतर मुंबई आणि कोलकाता येथे लपल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. पुढील तपासासाठी त्याचा ताबा गांधीनगर पोलिसांकडे देण्यात आला.
केस, दाढी वाढवून आला
पोलिसांना सापडू नये यासाठी संदेश तायडे याने गांधीनगरातील मित्रांशी संपर्क करणे टाळले होते. त्याने स्वत:चा मोबाइल नंबरही बंद ठेवला होता. गांधीनगरात जाण्याऐवजी तो सदर बाजार येथील आजीकडे गेला. ओळख लपवण्यासाठी त्याने केस आणि दाढी वाढवली. मात्र, अंमलदार वैभव पाटील यांना खबऱ्याकडून नेमकी टिप मिळाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.