सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुर्दैवाने सासू-सून असलेल्या दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला, तर कुटुंबातीलच दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय 45) व सुन काजल समीर पाटील (वय 30) असे मयत झालेल्या महिलांचे नाव आहे. तर अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यां दोघांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी जत व कवठेमहांकाळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जादूटोणा करणी यांची शंका आली त्यामुळे सदर कुटुंब गेल्या 15 दिवसापासून दडपणाखाली होते, अशीही माहिती मिळाली आहे.
घरातील चौघेजण निपचिप पडले होते
नांगोळे गावामध्ये पाटील कुटुंबीयांचे ढालगाव रस्त्यालगत घर आहे. या घरामध्ये अल्लाउद्दीन पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील, काजल समीर पाटील व दोन लहान मुले असे कुटुंबीय राहतात. या घरामध्ये पाटील यांच्या कुटुंबातील एका वयस्कर महिलेने घरातील चौघेजण निपचिप पडलेले आहेत हे पाहिल्यानंतर आरडाओरडा करून, शेजारी राहणाऱ्या सर्वांना बोलविले. घटनास्थळी सर्वांनी पाहिले असता चौघेजण निपचिप पडलेले होते.
घरातील दोन्ही मुले सुरक्षित
घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी चार ग्लास मिळून आले. त्या ठिकाणी लिंबू कापून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सूरी देखील मिळाली. त्या ठिकाणापासून बाजूलाच जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध देखील पोलिसांना घटनास्थळी मिळून आले. यामुळे या चार जणांनी विषारी औषध प्राशन केले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर घरातील समीर पाटील यांची दोन मुले आहेत. एक सहा वर्षाचा आहे तर दुसरा सहा महिन्यांचा आहे. या दोघांना मात्र कोणतीही विषबाधा झाली नसून दोन्ही मुले सुरक्षित आहेत.