लाखनी तालुक्यातील मासलमेटा-लाखोरी वळणावर शुक्रवारी सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या मिनी मालवाहक वाहनाचा भीषण अपघात झाला. किन्ही/एकोडी येथून शहापूर जवाहरनगर येथे रोवणीच्या कामासाठी निघालेल्या या वाहनाने रस्त्यावर अचानक आलेल्या एका बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमावले आणि झाडावर जोरदार धडक दिली.
या अपघातात सायत्रा नेवारे (वय ५०, रा. किन्ही) या महिलेचा मृत्यू झाला, तर २१ महिला मजूर जखमी झाल्या आहेत.अपघातात ८ महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गंभीर जखमींमध्ये छत्रपती बोरकर (४०), जोत्सना सोनवाणे (३६), वंदना सोनवाणे (३४), प्रमिला शेंडे (४०), रत्नमाला बोरकर (३५), वैशाली सोनवाणे (३७), रामकला नेवारे (३०) आणि प्रमिला गेडाम (४२) यांचा समावेश आहे. उर्वरित पाच जखमी महिलांवर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात, तर एका महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहनचालकाने रस्त्यावर आलेल्या बालकाला वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घेतला, मात्र त्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना भंडारा येथे हलवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रोवणीच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे