आधारकार्ड शिवाय भारतात सध्या कोणतेही काम शक्य नाही. हे कार्ड प्रत्येकाची एक खास ओळख आहे. बँकेची कामे, मोबाईल सिम खरेदी किंवा सरकारी योजनांचा लाभ, शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते.
हे कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. हे कार्ड वापरताना UIDAI ने काही नियम बनवले आहेत. जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत. या नियमांचे पालन न केल्यास तुरूंगवासासह दंड देखील होऊ शकतो. हे नियम काय आहेत आणि त्यासाठी शिक्षा काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
आधार कार्ड बनवताना खोटी माहिती दिल्यास शिक्षा
आधार कार्ड तयार करताना UIDAI ला खोटी किंवा चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही चुकीची माहिती दिल्याचे समोर आल्यास तुम्हाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन आधारकार्डसाठी अर्ज करत असताना अचूक माहिती आणि कागदपत्रे सादर करा.
दुसऱ्याच्या आधार कार्डमध्ये बदल करणे हा गंभीर गुन्हा
तुम्ही जर दुसऱ्याच्या आधार कार्डची माहिती बदलत असाल किंवा त्या व्यक्तीच्या ओळखीशी छेडछाड करत असाल तर हाही एक गंभीर गुन्हा आहे. अशी चूक केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्याच्या परवानगीशिवाय त्यांच्या आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करू नका, असे केल्यास तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
डेटा लीक केल्यास कठोर कारवाई
काही लोक UIDAI ची परवानगी नसतानाही आधारशी संबंधित एजन् सुरु करताता आणि लोकांची माहिती गोळा करतात. हे कायद्याच्या विरुद्ध आहे. एखाद्या व्यक्तीने असे केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच जर एखाद्या कंपनीने असे केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसऱ्याची वैयक्तिक माहिती गोळा करून अज्ञात व्यक्तीला दिल्यास तुरुंगवास आणि दंड अशी दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
आधार केंद्रावर चोरी केल्यास खैर नाही
एखाद्या व्यक्तीने आधार केंद्र हॅक केले किंवा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला तर तो एक गंभीर आहे. यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे आधार कार्ड वापरत असाल तर वरील चुका नक्की टाळा अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.




