राज्यासह देशात पावसाने कहर घातला. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना भेटलेली नसताना आता सतत राज्यात पाऊस पडताना दिसतोय. इतका जास्त पाऊस झाला की, शेतीमधील मातीही वाहून गेली. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. मोंथा चक्रीवादळाने अलीकडेच कहर केला. तामिळनाडू, ओडिशा, बंगाल, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडला. मोंथा चक्रीवादळाचे परिणाम अजूनही दिसत आहेत. हवामान खात्याने आणखी एका चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस पाऊस असणार असल्याचे स्पष्ट होतंय.
बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने नुकताच भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदमान आणि निकोबार बेटांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला. 4 नोव्हेंबरपासून ते तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर अंदमान समुद्रात 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 4 नोव्हेंबरनंतर ही हवामान प्रणाली तीव्र होण्याची अपेक्षा आहे आणि समुद्राची परिस्थिती खवळलेली राहील.
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
या चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण देशात दिसेल आणि पावसाची देखील शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर अधिक वाढले. राज्यात पुढील 24 तासात हलका ते मुसळधार पाऊस होईल. बीड, हिंगोली, नांदेड,लातूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, आहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव या भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
नव्या चक्रीवादळाचा राज्यात धोका
नव्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर पुन्हा एका राज्यात असेल असा अंदाज आहे. मच्छिमारांना उत्तर अंदमान समुद्र आणि आसपासच्या पाण्यात जाऊ नये असा सल्ला दिला जात आहे. बोट चालक आणि पर्यटकांनाही अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका मागून एक चक्रीवादळ धडकताना दिसत आहेत. मोंथा चक्रीवादळाचा मोठा परिणाम राज्यावर बघायला मिळाला. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.



