बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्ज घेण्यासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण देत असल्याचे भासवून तासगावातील गवळी कुटुंबाने तब्बल 1 कोटी 37 लाख 34 हजार 396 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक करणारे कर्जदार सतीश बाबासाहेब गवळी (46) आणि जामीनदार मारुती राजाराम गवळी (53) या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य कर्जदार संगीता सतीश गवळी (39) संतोष बाबासाहेब गवळी (49) आणि जामीनदार शिवलिंग दगडू पाखरे (78, रा. चिंचणी, आडवा ओढा, ता. तासगाव) हे फरारी आहेत. नेमिनाथनगर परिसरातील गणपती मंदिरानजीक बाई अर्बन बँकेची शाखा आहे. या बँकेमधून दि. 30 डिसेंबर 2019 रोजी संशयित कुटुंबाने 70 लाखांचे कर्ज काढले होते. याकरिता तारण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे त्यापेक्षा अधिक मूल्यांकनासाठी काही नव्हते. त्यामुळे गवळी यांनी दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकती तारण देत असल्याचे बँक अधिकाऱ्यांना भासवले. तशी बोगस कागदपत्रे तयार केली आणि बँकेकडून 70 लाखांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी या कर्जाचे हप्तेदेखील भरले नाहीत.
30 सप्टेंबर 2025 अखेर त्यांनी बँकेत कोणतीही रक्कम भरली नाही. त्यामुळे या 70 लाखाच्या कर्जाची व्याजासहित थकीत रक्कम 1 कोटी 37 लाख 34 हजार 396 रुपये झाली आहे. त्यांनी कर्जासाठी जी जमीन दाखवली व कागदपत्रे दिली, ती पूर्णपणे बनावट होती. त्यामुळे बँकेची फसवणूक झाली आहे. त्यामुळे बँकेने या पाच जणांविरोधात 30 सप्टेंबररोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच हे पाचही जण फरार झाले होते. त्याचा शोध सुरू होता. परंतु ते मिळून येत नव्हते. तपासादरम्यान पोलिस पथकाने सतीश गवळी व मारुती गवळी या दोघांना अटक केली.



