केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ह्या योजनेचा 21वा हप्ता बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
राज्यातील एकूण ९७ लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी २,००० रुपयांची मदत मिळणार आहे. फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतीजमीन नोंदली आहे, ते शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जातात.
सोलापूर जिल्ह्यातील चार लाख ९० हजार ५६६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाकडून देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो. दरम्यान आता नमो शेतकरी चा पुढचा हप्ता पण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या पीएम किसान चा हप्ता जाहीर झाला की थोड्या दिवसांनी राज्य शासनाच्या योजनेचा हप्ता मिळणार आहे.
केंद्राच्या मदतीनंतर राज्य सरकारतर्फेही ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत तेवढीच रक्कम महिनाअखेर वितरित केली जाणार आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत नमो शेतकरी चा हप्ता पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. या दोन्ही योजनांमधून एका कुटुंबातील फक्त एकाच शेतकऱ्याला वर्षाकाठी ६,००० रुपये केंद्राकडून आणि ६,००० रुपये राज्य सरकारकडून, अशी एकूण १२,००० रुपयांची मदत मिळणार आहे. मात्र, पती-पत्नीच्या संयुक्त सातबारा उताऱ्यावर जमीन असली, तरी लाभ फक्त महिलेला मिळणार आहे. या नव्या नियमांमुळे सोलापूर जिल्ह्यातील ९,४०० शेतकऱ्यांचा लाभ कायमचा बंद झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानीत भरपाईसाठी अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम चुकीच्या बँकेत जमा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ज्यांना भरपाई मिळालेली नाही, त्यांनी आपल्या गावातील ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त (CSC) जाऊन तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. येथे मंजूर रक्कम कुठे जमा झाली, ती वितरित झाली की नाही, याची सर्व माहिती मिळू शकते. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी ती २० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. वितरित रक्कम खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.






