Thursday, April 30, 2026
Homeमहाराष्ट्रनोकरी लागल्याचा आनंद अन् काळाचा घाला; भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण ठार

नोकरी लागल्याचा आनंद अन् काळाचा घाला; भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण ठार

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुली येथे सोमवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी (वय २५) असे त्याचे नाव आहे.

 

या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ओम गिरी हा दुचाकीने (एमएच १९, सीबी ८६४४) शिवराणानगरमध्ये नवीन घरी जात होता. मानराज पार्क चौकातून महामार्ग ओलांडताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच १८, बीझेड ०६२२) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती, की ओम ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात घडताच परिसरातील नागरिक व वाहनधारकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. भररस्त्यात अपघात झाल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. दरम्यान, ओम गिरी हे जळगाव जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष रवींद्र गिरी यांचे पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे.

 

या घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, महामार्गावरील जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे. ओम हा नोकरीनिमित्त पुणे येथे राहत होता तर शिवराणानगरमध्ये त्याची आई व बहीण राहते. रविवारीच तो घरी परतला होता. ओम हा कुटुंबात कमावता व्यक्ती होता. एकुलता एक मुलगा या अपघाताने हिरावला गेल्याने आई व बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या मृत्यूची वार्ता समजताच आईसह बहिणीने प्रचंड आक्रोश केला.

 

पुणे येथे एका कंपनीत ओम हा नुकताच नोकरीला लागला होता. रविवारी तो सुटी घेऊन जळगावात घरी आला. त्यानंतर रात्री तो प्रेमनगरमधील जुन्या घरी झोपण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकीने शिवराणानगरमध्ये नवीन घरी जात होता. ओमच्या डोक्याला गंभीर मार लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

उपमहापौर, नगरसेवक धावले मदतीला

 

अपघातानंतर महामार्गावर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्या वेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे वाहतूकही विस्कळित झाली होती. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक अमर जैन हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. अपघातानंतर रामानंदनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेत महामार्गावरील गर्दी कमी करून वाहतूक सुरळीत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -