राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही जागांवर सर्व पक्षांचे एकमत झालेले आहे, मात्र काही जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे, कारण एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.
7 जागांसाठी एकनाथ शिंदे आग्रही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या 17 पैकी 7 जागांसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. आज सकाळी नंदनवन इथे मंत्री बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत बैठक झाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या जागेचा काढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष करून ठाण्याच्या जागेसाठी शिंदे आग्रही असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे विधान परिषदेच्या जागांचा तिढा सुटणार का ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दिल्लीत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता
विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यश्र रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र अद्याप भाजप आणि शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बावनकुळेंनी काय म्हटले?
आज सकाळी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्यांनाच देण्याचा विचार सुरू असून त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळीही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता अशी माहिती दिली होती. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जागावाटपाचा निर्णय दिल्लीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


