सांगली शहरासह कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, वाळवा तालुक्यासह ठिकठिकाणी गुरुवारी वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. काही भागात गारपीट झाली. रस्त्यावर गारांचा खच पडला होता. गारपिटीमुळे द्राक्ष पिकांसह इतर पिकांना फटका बसल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.
सांगलीत सकाळपासून उकाडा जाणवत होता. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दुपारी चारच्या सुमारास वादळी वार्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने वाहनचालक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातही वादळी वार्यासह गारपीट झाली. जोरदार वार्याने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या.
आष्टा : आष्टा शहर व परिसराला सायंकाळी वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या पावसाने भाजीपाला व फळबागासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी, बावची, गोटखिंडी या भागातही जोरदार पाऊस पडला.
पलूस : तालुक्यात वादळी वार्यासह पावसाने झोडपून काढले. कुंडल, दुधोंडी रामानंदनगर, भिलवडी, आमणापूरसह परिसरात जोरदार सरी बरसल्या. बुर्ली, नागठाणे, संतगाव, अंकलखोप परिसरात गारपीट झाली. परिणामी द्राक्ष शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तसेच येथील धोंडीराज यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या जंगी कुस्त्याचे मैदान रद्द करण्यात आले आहे.