राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युती होकार दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर यांनी दिली आहे.गेल्या आठवड्यात, प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही युतीचे संकेत दिले होते. “राज्यात निवडणुका कधी लागणार? यावर सर्व अवलंबून आहे. निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबोडतोब एकत्र येऊ, नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही नंतर एकत्र येऊ”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
तसेच, “आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. पण दोन्ही पक्षांकडून आम्हाला काहीही उत्तर मिळालेलं नाही. उद्धव ठाकरेंबरोबर एक कार्यक्रम झाला होता. पण तो अराजकीय होता. त्यामुळे आगामी ग्रामंपचायतीच्या निवडणुकासाठी आम्ही स्वत:चे पॅनल उभे करून लढणार आहोत, असही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस, शिवसेना या पक्षांचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांचा राष्ट्रवादीला विरोध होता. त्यामुळे तेव्हा ही आघाडीची चर्चा फिस्कटली होती. यामध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी केली होती, त्यामुळेही आघाडी झाली नसल्याचे सांगण्यात येते.
प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे. त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले असले तरी, यायचे असले तरी राष्ट्रवादीचे काय करणार असा प्रश्नच आहे. प्रकाश आंबेडकर आपली भूमिका सोडणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीला सोडून आंबेडकरांशी युती आकड्यांच्या दृष्टिकोनातुनही परवडणारी नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीला जवळपास २५ लाख मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीला ९२ लाख मते मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. त्यामुळे जर वंचित, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र आल्यास भाजपला या आघाडीचा फटका बसु शकतो, अशीही राज्याच्या वर्तुळात चर्चा सरु आहे.