आयपीएलचं यंदाचं पर्व आता चांगलंच रंगात येताना दिसत आहे. अनेक संघ जेतेपदासाठी दमदार खेळाचं प्रदर्शन करत आहेत. तर, काही संघांच्या मागे लागलेली पराभवातील साडेसाती काही केल्या पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये. अशा परिस्थितीत काही नावं सातत्यानं नजरा वळवत आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्माच्याही नावांचा समावेश आहे. सध्या मात्र Team India साठी खेळणारे आणि IPL मध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही खेळाडू वेगळ्याच कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहेत.
असं म्हटलं जातंय की, रोहित आणि विराट यंदाचं आयपीएल पूर्ण न करताच अर्ध्यावरून या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. चक्क आयपीएल सोडून जाण्याचा निर्णय त्यांना का घ्यावा लागतोय? हाच प्रश्न आता क्रिकेटप्रेमींना पडत आहे. तर, या प्रश्नाचं उत्तर आहे WTC अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप.
7 ते 11 जून या काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये WTC चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या केनिंगटन ओवलमध्ये हा सामना खेळवला जाईल. ज्यासाठी शिव सुंदर दास यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समिती लवकरच भारतीय संघाची घोषणा करेल. या सामन्यासाठी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविड 23 किंवा 24 मे रोजी London च्या दिशेनं निघेल. सोबतच भारतीय संघातील काही खेळाडूसुद्धा या सामन्यासाठी निघणार आहेत.
काही खेळाडू आयपीएलमधील जबाबदारी पूर्ण करून लंडनच्या दिशेनं निघतील, तर काही द्रविडसोबत. मुंबई आणि बंगळुरूचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले नाहीत तर या खेळाडूंमध्ये रोहित आणि विराटच्याही नावाचा समावेश असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंची संभाव्य यादी
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, उमेश यादव.
रहाणेला सुवर्णसंधी?
पाठीच्या दुखापतीमुळं संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळणं कठीण बाब अल्यामुळं अजिंक्य रहाणेसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. सूर्यकुमार यादवकडे कसोटी सामना खेळण्यासाठी पुरेसा अनुभव नसल्यामुळं निवड समिती रहाणेला प्राधान्य देऊ शकते. त्यामुळं ही संधी मिळाल्यास तिचं सोनं करण्यात तो यशस्वी होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.