छोट्या मोठ्या गोष्टींमुळे राग आला म्हणून किंवा आणखी काही कारणामुळे टोकाचं पाऊल उचलण्याचे, आयुष्य संपवण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. त्यामध्ये तरूणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. संगमेश्वर येथेही असाच एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. तेथे अवघ्या आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली आहे. शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर न उठवल्याने, त्याचा राग येऊन त्या मुलीने हे टोकाचं पाऊलं उचललं आणि आयुष्यच संपवून टाकलं. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काही दिवसांपूर्वीच संगमेश्वर तालुक्यातील एका युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तर दोन-तीन दिवसांपूर्वी संगमेश्वरमध्ये पुन्हा एक अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं. शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवलं नाही याचा त्या मुलीला प्रचंड राग आला. आणि त्याच रागातून तिने आत्महत्या करत जीवनाचा शेवट केला. मात्र यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली.
मोहोळ तालुक्यात विवाहितेने विहिरीत उडी मारून जीवन संपवलं
तर सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातही एक धक्कादायक घटना घडजली आहे, तेथे विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. सासू सासरे आणि दिराने घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने विवाहित महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. स्वप्नाली संग्राम हजारे हिने आष्टी या गावात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हजारे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यातून स्वप्नाली हिच्या नावावर ट्रक घेतल्यानंतर हप्ते थकल्यामुळे फायनान्स मधील अधिकारी हप्ते वसुलीसाठी घरी येत असल्यामुळे सासू-सासरे, दीर यांनी स्वप्नालीला त्रास दिला होता. याप्रकरणी सासू-सासरे आणि दीर यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला, स्वप्नाली हजारे हिचा भाऊ तुषार कोळेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती.