महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट सध्या टळले आहे, आणि पुढील १५ दिवस अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील तापमान सरासरीपेक्षा थोडे कमी राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रब्बी पिकांना दिलासा मिळेल.
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील कमाल तापमान ३६ डिग्री दरम्यान आणि किमान तापमान १८-२० डिग्री दरम्यान आहे, जे सामान्य मानले जाते. पुढील काही दिवस तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे, पण तरीही ते सरासरीपेक्षा कमीच राहील.
सोमवारी सोलापूर आणि सांगलीमध्ये अवकाळीने हजेरी लावली होती. पण पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्याचे तापमान कसं असेल, त्याबाबतचा अंदाज जाणून घेऊयात…
सध्याचे तापमान कसं आहे ?
मागील आठवडयात ३-४ दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा, गहू सारख्या रब्बी पिकावर विपरित परिणाम जाणवला. परंतु अवकाळीच्या ह्या वातावरणामुळे लगेचच २-३ डिग्रीने घसरलेल्या कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या दिवसाचे कमाल तापमान, कोकणात ३०-३२ तर उर्वरित महाराष्ट्रात ३६ डिग्री दरम्यान आणि किमान तापमान हे १८-२० डिग्री दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे.
पुढील तापमानाचा अंदाज काय ?
कमाल तापमानात वाढीची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी पुढील १०-१२ दिवस म्हणजे गुढीपाडवा व त्यानंतरही २ ते ३ दिवस म्हणजे साधारण २ एप्रिल पर्यंत कमाल व किमान तापमान ही महाराष्ट्रात सरासरीच्या खाली असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे पिकांना मदतच होईल, शिवाय उभ्या असलेल्या रब्बी पिकांचा, गत ६०-६५ दिवसाचा अवकाळी व गारपिटीचा धोक्याचा काळही निभावला आहे.
एप्रिलमध्ये अवकाळीची शक्यता जाणवते काय ?
कमकुवत ‘ला-निना’ व तटस्थ ‘आयओडी’ ह्या स्थितित जरी सध्या काहीही बदल जाणवत नसला तरी ‘एमजेओ’ ची सायकल, एप्रिलच्या पहिल्या आठवडयात, भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या परिणामातून काय वातावरणीय बदल घडून येतील हे त्याचवेळी लघुपल्ल्याच्या अंदाजात कळून येईल. मार्च अखेरीस ह्याचाही खुलासा होवू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.