आयपीएलच्या 18 व्या मोसमाची सांगता झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचे (India Tour of England 2025) वेध लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध 20 जूनपासून कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली कसोटी मालिका असणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्याच्या काही दिवसांआधी हेड कोच गौतम गंभीर आणि नवनियुक्त कर्णधार शुबमन गिल या दोघांनी मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्याआधी कोच-कॅप्टनची जोडी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत हे दोघे काय बोलणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. शुबमन गिल याची कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद असणार आहे. इंग्लंड दौऱ्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यामुळे रोहितच्या जागी शुबमनला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे कर्णधार झाल्यानंतर शुबमन गिल माध्यमांसमोर काय बोलणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे
गंभीर आणि शुबमन या दोघांना या पत्रकार परिषदेत अनेक तिखट प्रश्नाचा मारा सहन करावा लागू शकतो. कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर याला वगळण्यात आलं. त्यावरुन या दोघांना प्रश्न केला जाऊ शकतो.
विराट कोहलीच्या जागी कोण खेळणार?
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता विराट कोहलीच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. विराटच्या जागी कोण खेळणार? याबाबतचा निर्णय गंभीर आणि गिल हे दोघे घेतील, असं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर 24 मे रोजी भारतीय संघाची घोषणा करताना म्हणाले होते. त्यामुळे आता या प्रश्नाचं दोघे काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.