जर आपण LPG अर्थात लिक्विफाइड पेट्रोलियम गैस वापरत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. एलपीजी गॅस संदर्भात केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, आता ज्या घरांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन घेतले जाईल, त्यांना ३० दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे.
हा नियम इंडेन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस धारकांसाठी लागू असले. खरेतर, डुप्लिकेट कनेक्शन्स बंद करणे, अनुदानाचा योग्य वापर करणे आणि सिलेंडरचा पुरवठा ग्रामीण तथा निमशहरी भागांकडे वळवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
गेल्या मे महिन्यात सरकारने ‘LPG (पुरवठा आणि वितरणाचे नियमन) दुरुस्ती आदेश, २०२६’ जारी केला आहे. या अंतर्गत, समजा एखाद्या कुटुंबाने १ जून रोजी पीएनजी कनेक्शन घेतले असे, तर त्यांना १ जुलैपर्यंत आपले एलपीजी खाते बंद करावे लागेल. या कालमर्यादेचे पालन न केल्यास एलपीजी रिफिलिंगवर बंदी येऊ शकते आणि खाते बंद केले जाऊ शकते.
महत्वाचे म्हणजे, नोकरी किंवा शिक्षणानिमित्त स्थलांतर करणाऱ्या भाडेकरू, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठीही सरकारने विशेष तरतूद केली आहे. कनेक्शन सरेंडर केल्यानंतर ग्राहकांना ‘ट्रान्सफर व्हाउचर’ देण्यात येणार आहे. याच्या मदतीने पीएनजी सुविधा नसलेल्या भागात पुन्हा एलपीजी कनेक्शन मिळवता येईल.
सध्याच्या नियमांनुसार, ग्राहक क्षेत्रानुसार २५, ३५ किंवा ४५ दिवसांच्या अंतराने सिलेंडर बुक केले जाऊ शकतात. दरम्यान, तेल कंपन्या दोन्ही कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांचा डेटाबेस तपासत असून, काळाबाजार व व्यावसायिक गैरवापर रोखण्यास मदत होईल. तसेच, नव्या नियमानुसार आता डिलिव्हरी एजंटकडून सिलेंडर घेताना ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला वन-टाइम पासवर्ड (OTP) सांगावा लागेल.





