अलीकडेच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजुंनी हल्ले झाले. त्यानंतर आता भारताच्या आणखी एका सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. अरुणाचल प्रदेशात भारत-म्यानमार सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झालीय. भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सुरु केलं आहे. सुरक्षापथकांना अरुणाचल प्रदेशच्या लोंगडिंग जिल्ह्यात पोंगचौ सर्कलवर अज्ञात केडर्सच्या हालचालींबद्दल माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी गुरुवारी सीमावर्ती भागात गस्त सुरु केली.
संरक्षण मंत्रालयानुसार, घनदाट जंगलातून जाताना सुरक्षापथकांना अज्ञात लोकांच्या हालचाली दिसल्या. एरियामध्ये अज्ञात लोक ये-जा करताना दिसल्यानंतर सुरक्षापथकांनी त्यांना हटकलं. त्यानंतर सुरक्षापथकांनी केलेल्या गोळीबाराला या केडर्सनी सुद्धा गोळीबाराने उत्तर दिलं. या गोळीबाराला सुरक्षापथकांनी चोख प्रत्युत्तर दिलं. भीषण गोळीबार सुरु असताना अज्ञात केडर आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार करुन म्यांमारला निघून गेले. सुरक्षापथकांनी त्या भागाची तपासणी केली. केडर आसपासच्या घनदाट जंगलाचा फायदा घेऊन सीमापार करण्यात यशस्वी ठरले.
10 दहशतवाद्यांचा खात्मा
याआधी 14 मे रोजी दक्षिण मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात असम रायफल्ससोबत झालेल्या चकमकीत 10 दहशतवादी मारले गेले. चंदेल जिल्ह्याची सीमा म्यांमारला लागून आहे. भारत-म्यांमार बॉर्डरवर सुरक्षापथकं अलर्ट झाली आहेत. प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. संरक्षण प्रवक्त्याने सांगितलं की, 14 मे च्या चकमकीवेळी चंदेल जिल्ह्यात म्यांमार सीमेजवळ न्यू समताल गावाजवळ संशयित कॅडर्सनी असम रायफल्सच्या गस्ती पथकावर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. त्यानंतर सैनिकांनी अचूक आणि कॅलिब्रेटेड उत्तर दिलं. यात 10 दहशतवादी मारले गेले.
चार राज्यांची सीमा म्यानमारला लागून
भारत-म्यांमार सीमेवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. प्रत्येक हालचालींवर सुरक्षा पथकांची नजर आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी नागरिक प्रशासन आणि गोपनीय संस्थांमध्ये चर्चा सुरु आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि मिजोराम या चार राज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे.