मुंब्र्यातील अपघातात चार प्रवाशांनी आपला जीव गमावला. त्यामध्ये उल्हासनगरचा तरूण केतन सरोजचाही मृत्यू झाला. अवघ्या 23 वर्षांचा केतन हा गेल्या तीन महिन्यांपासून ठाण्यात नोकरी करायचा. आई, वडील आणि दोन छोटे भाऊ असं केतनचं कुटुंब. रोजसारखाच आजही केतन कामासाठी घराबाहेर पडला पण आता तो कधीच परतणार नाही.
मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये उल्हासनगर 1 मधील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या केतन दिलीप सरोज याचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने हनुमान नगर परिसरात एकच शोककळा पसरली. या घटनेमुळे केतनची आई-वडील, भाऊ आणि कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
Mumbai Train Accident : एकुलता एक कमावणारा मुलगा
केतन सरोज याच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असताना त्याने आपलं शिक्षण बीकॉम पर्यंत पूर्ण केलं. त्यानंतर त्याला ठाण्यात एका खाजगी कंपनीत सेल्समॅनची नोकरी मिळाली. केतन हा घरातील एकुलता एक कमावणारा मोठा मुलगा होता आणि त्याच्यामुळे घरातील उदरनिर्वाह सुरू होता. परंतु त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे सरोज कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Mumbai Railway Accident : कामाला गेला, परतलाच नाही
नेहमीप्रमाणे केतन सरोज कामावर जाण्यासाठी निघाला होता. परंतु मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातात केतनचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप करताना याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच असल्याचे सांगितले आहे.
याआधी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आज आमच्या कुटुंबीयातील एक सदस्य गेला आहे. उद्या आणखी दुसऱ्या कुटुंबाला अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागेल असं सरोज कुटुंबीयांनी म्हटलं.
Mumbra Train Accident : लोकलमधून पडून चार जणांचा मृत्यू
आजूबाजूच्या उपनगरांमध्ये राहणारा आणि मुंबईत कामाला जाणाऱ्याला रोज जीवघेण्या गर्दीत मृत्यूला हुलकावणी देत प्रवास करावा लागतो. मात्र आज मृत्यूनं मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ चार प्रवाशांवर झडप घातलीच आणि अनेकांना गंभीर जखमी केलं. कसऱ्याहून मुंबई सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी, आणि सीएसएमटीवरून कल्याणच्या दिशेनं जाणारी लोक एकमेकांना क्रॉस करत असताना हा अपघात घडला.
दोन्ही लोकलमध्ये दरवाज्यावर उभे असणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले. एकूण 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले. त्यातल्या चौघांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी झालेत. जखमींवर कळव्यातील सरकारी रूग्णालय आणि ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai Local Train Accident : अपघातांना आळा बसणार का?
मुंबई लोकलमधून प्रवास करताना होणारे अपघात रोखण्यासाठी ऑटोमेटेड डोअर क्लोजर म्हणजेच, लोकलला स्वतःहून बंद होणारे दरवाजे बसवण्याची कल्पना मांडली जातेय. त्यासाठी रेल्वे प्रशासन कामाला देखील लागलंय. मात्र स्वतःहून बंद होणारे दरवाजे लावल्यानंतर अपघातांना आळा बसेल का असा प्रश्न अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी या संकल्पनेला तीव्र विरोध केला.