शहरासह जिल्ह्यात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात दिवसभर सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. पाच धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली
राधानगरी धरणातून होणारा विसर्ग सायंकाळी साडेपाच वाजता 2500 क्युसेकपर्यंत वाढवला. गेल्या 24 तासांत 12 तालुक्यांत सरासरी 16.5 मि.मी. पावासाची नोंद झाली. सोमवारी (दि. 16) व मंगळवारी (17) जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शहरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. शाळा सुरू होणार असल्याने रविवारी बाजारपेठांत नागरिकांची गर्दी होती. मात्र पावसापासून वाचण्यासाठी सर्वत्र ताडपत्री मारलेली दिसत होती. पालेभाज्या प्लास्टिकच्या कागदाने झाकल्या होत्या. सखल भागात पाणी साचले होते. यामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच कसरत होत होती. पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ झाली. शनिवारी रात्री 9 वाजता पातळी 12 फूट 7 इंचावर होती. रविवारी यामध्ये वाढ झाली असून रात्री 8 वाजता पातळी 13 फूट 1 इंचापर्यंत वाढली असून इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे.
गगनबावड्यात सर्वाधिक 48 मि. मी. पाऊस
शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, कागल, गडहिंग्लज चंदगड, आजरा या तालुक्यांतील गावांमध्ये पावसाने जारदार हजेरी लावली. 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर चंदगड 46, शाहूवाडी 26.6, भुदरगड 24.9, आजरा 22.4, गडहिंग्लज 18.8, कागल 18.3, राधानगरीत 16.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली.
जांबरे धरण क्षेत्रात 90 मि.मी. पाऊस
दोन दिवसांपासून धरण क्षेत्राताही पावासाचा जोर वाढला आहे. 24 तासांत पाटगाव 77 मि.मी., जंगमहट्टी 89, घटप्रभा 80, जांबरे 90, कोदे 68 मि.मी. या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरी 27, तुळशी 20, वारणा 36, दूधगंगा 30, कासारी 54, कडवी 33, कुंभी 45, चिकोत्रा 32, चित्री 36, आंबेओहळ 12, सर्फनाला 23, धामणी येथे 24 मि. मी. पावसाची नोंद झाली.
कुंभीतून 300 क्युसेक विसर्ग
कुंभीतून 300 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. यामुळे कुंभी नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.