एक मोठी बातमी समोर येत आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे. तर हिंदीऐवजी इतर भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थी असणं अनिवार्य असणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून हा नवा जीआर काढण्यात आला आहे. हिंदी भाषा सक्तीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला होता. इतंकच नाहीतर महाराष्ट्रात मराठीच भाषा बोलली गेली पाहिजे, यासाठी राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर हिंदी भाषा सक्तीची नाही असं म्हणत यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले होते. यादरम्यान आता पहिली ते पाचवीसाठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार असल्याचा जीआर शासनाकडून काढण्यात आला आहे.
दरम्यान, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांचा विरोध आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात आणि मराठीला सर्वाधिक धोका कोणापासून असेल तर हिंदीपासून नाही गुजरातीपासून आहे, असं राऊत म्हणाले.